सिंदेवाही, दि. 8 सप्टेंबर : सिंदेवाही शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकातील रस्ता दुभाजक (डिव्हायडर) हा वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या काही दिवसांत या ठिकाणी वारंवार अपघात होत असून दोन वेळा भरधाव ट्रक थेट डिव्हायडरवर घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता डिव्हायडर पूर्णपणे तुटलेला व उखडलेला दिसून येतो. रात्रीच्या वेळी दिसण्यासाठी कोणतेही रिफ्लेक्टर, रंग, सूचना फलक किंवा गतिरोधक लावण्यात आलेले नाहीत. चंद्रपूर – गडचिरोली हा महामार्ग असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक असते. रात्रीच्या वेळी बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना अचानक समोर आलेल्या तुटलेल्या डिव्हायडरचा अंदाज येत नाही आणि अपघात होतो.
“जीवितहानीची वाट पाहताय का?”- प्रणित गोलपल्लीवार
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रणित गोलपल्लीवार
यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. “सिंदेवाही शिवाजी चौकात वारंवार अपघात होऊनही प्रशासन झोपले आहे का? दोनदा ट्रक अपघात होऊनही डिव्हायडरची दुरुस्ती होत नाही, साधे पांढरे पट्टे मारले जात नाहीत. एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच याकडे लक्ष देणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी तातडीने –
1.तुटलेल्या डिव्हायडरची दुरुस्ती करावी
2.रिफ्लेक्टर आणि रेडियम लावा
3.वेगतिरोधक आणि सूचना फलक बसवावे
4.रात्री पुरेसा प्रकाश (स्ट्रीट लाईट) सुरू करावा
अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

