
सिंदेवाही टाइम्स, चंद्रपूर | 24 जून 2026
शेतकऱ्यांनो, यापुढे पीक नोंदीसाठी तलाठी ऑफिसच्या चकरा मारण्याची गरज नाही! राज्य शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. 15 जुलै 2026 पासून चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ई-पीक पाहणी साठी सरकारी कर्मचारीच थेट शेतात येणार आहेत.
काय आहे नवीन पद्धत?
सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद करण्यासाठी शासनाकडून नियुक्त केलेला सरकारी कर्मचारी किंवा बचत गटातील महिला प्रतिनिधी शेतात येऊन मोबाईल अॅपद्वारे पिकाचा फोटो आणि GPS लोकेशनसह नोंद करणार आहे. याला ई-पीक पाहणी असे म्हणतात. ही माहिती थेट शासनाच्या सर्व्हरवर अपडेट होणार आहे.
शेतकऱ्यांचे 3 मोठे प्रश्न सुटले:
1. तलाठ्याकडे धावपळ बंद: आत्तापर्यंत शेतकऱ्यांना स्वतः अर्ज देऊन नोंद करावी लागत होती. आता सरकारी माणूस शेतात येणार.
2. स्मार्टफोन/नेट नाही तरी टेन्शन नाही: ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आणि अनेकांकडे स्मार्टफोन नसल्याने नोंदी अपूर्ण राहत होत्या. आता शासनाचा कर्मचारी मोबाईल घेऊन येणार.
3. नोंद 100% अचूक: फोटो + GPS मुळे चुकीची नोंद, फेरफार किंवा टाळाटाळ होणार नाही. पीक विमा, कर्ज, अनुदानासाठी ही नोंद पक्का पुरावा ठरणार.
बचतगटाच्या महिलांना रोजगार:
ग्रामीण भागात मदत म्हणून बचत गटातील महिलांनाही या कामासाठी नेमण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांनाही स्थानिक पातळीवर मदत मिळेल.
नोंदीची मर्यादा वाढली:
आधी पीक पाहणीची मर्यादा 10 गुंठे होती. आता ती 20 गुंठे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लहान शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, चंद्रपूर यांनी सांगितले की, ई-पीक पाहणी प्रक्रिया अधिक सोपी आणि अचूक करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे तांत्रिक अडचणी दूर होऊन शेतकऱ्यांना वेळेत आणि सहजपणे पीक नोंद करता येणार आहे.
शेतकऱ्यांना आवाहन:
15 जुलै 2026 नंतर शेतात कोणी सरकारी कर्मचारी किंवा बचत गटातील महिला आल्या तर त्यांना 7/12 उतारा आणि आधार कार्ड दाखवून सहकार्य करावे. नोंद चुकली तर पीक विमा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते.
तुमच्या गावात ई-पीक पाहणीसाठी कोण आले? अनुभव कमेंटमध्ये सांगा.
#EPikPahani #ShetkariNews #ChandrapurKrishi #SindwahiTimes #पीकनोंद
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स
